रत्नागिरी (Pclive7.com):- रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक १५ तासांपासून ठप्प झाली आहे. टँकरमधील एलपीजी गॅस सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारत पेट्रोलियम’ कंपनीचा हा टँकर गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी पुलावरून काजळी नदीपात्रात कोसळला आहे. या टँकरमध्ये जवळपास २४ ते २५ किलो एलपीजी गॅस असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या टँकरमधून एलपीजी गॅस लीक होत असल्याने जोखीम वाढली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या टँकरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल होत असल्याचे बोलले जात आहे.
हा टँकर गुरुवारी जयगडहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी येथील तीव्र उतारावरुन चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर नदीत कोसळला. या अपघातात उस्मानाबादचे चालक प्रमोद जाधव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पथकासह ‘फिनोलेक्स’, ‘जिंदाल’ कंपन्यांची सुरक्षा पथके दाखल झाली आहेत. उंचावरुन नदीपात्रात कोसळल्यामुळे टँकरचे तीन तुकडे झाले आहेत.
‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करावा..
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे. देवधे, पुनस, काजरघाटीमार्गे प्रवाशांना रत्नागिरीला पोहोचता येणार आहे.