पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड तसेच, चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकाचा केवळ फार्स करण्यात आला. गेल्या दहा वर्षांत आपल्याच सत्ताकाळात एकही समस्या सोडवू न शकलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाने आपल्याच अपयशाचा आरसा दाखविला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरूवारी केली आहे.
अजित गव्हाणे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताधाऱ्यांना एकाही वेळेस लघुउद्योजकांची आठवण झाली नाही. महापालिकेशी निगडीत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपला लघुउद्योजकांचा पुळका आला आहे. महापालिका, महावितरण, वाहतूक विभागाशी संबंधित प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. बैठकीतून लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत: ची राजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार करण्यात आला. एकाही विषयावर ठोस निर्णय झाला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
महापालिकेपासून केंद्रापर्यंत सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी लघुउद्योजक व त्यांच्या समस्यांकडे दूर्लक्ष केल्यामुळे शहरातील लघुउद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बस सुविधा, कचरा समस्या वाढत्या झोपडपट्ट्या, अनधिकृत भंगाराची दुकाने, वृक्ष लागवड व संवर्धन, महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवाबाबत उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचा फार्स करणाऱ्या भाजप नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून या समस्या का सोडविल्या नाहीत, असा प्रश्र अजित गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.
शास्तीकर, रेड झोन, खंडीत वीजपुरवठा या समस्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत येतात का? याची जाणिवही नसणारे नेते बैठका घेऊन समस्या सोडविल्याचा फार्स करतात, असा आरोप गव्हाणे यांनी केला आहे.