पुणे (प्रतिनिधी):- मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात होऊन दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवाशी गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सहाच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ओझर्डे गावच्या हद्दीत झाला.
शशिकांत प्रितम साळुंखे, राहुल राजगुरू अशी मयत तरुणांची नवे असून प्रतीक अमरे हा तरुण जखमी झाला आहे. तिघेही पुण्यातील रहिवासी होते. प्रतीक अमरे याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईहून सकाळी प्रवासी वाहतूक करणारी टोयोटा कंपनीची गाडी प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने येत होती. आढेगाव जवळ आल्यावर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या बाजूला ५० फूट खोल खड्यात पडली. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.