पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येऊन आठ महिने झाले. या आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु झाला आहे. विरोधकच नव्हे तर भाजपचे पदाधिकारी सुद्धा पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज ‘महापालिका जवाब दो’ असा नारा देत मोर्चा काढला.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, युवा नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात कच-याचे साम्राज्य आहे. नागरिकांना साधे मुबलक पाणी देखील मिळत नाही. राष्ट्रवादीच्या काळात स्वच्छतेबाबत राज्यात पहिले व देशात नवव्याक्रमांकावर असलेले शहर भाजपच्या काळात शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्यांत निगडीपर्यंत नेणे गरजेचे असताना भाजपचे पदाधिकारी त्यावर ठोस बोलत नाहीत. बीआरटीएसचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित आहे. रिंगरोड बाधित नागरिक भयभित आहेत. शहरात एकही मोठे विकासाचे काम सुरु नाही. केवळ बोलबच्चन सुरु आहे. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली’खाबूगिरी’ सुरु आहे. पारदर्शी काम, कधी लागणार भ्रष्टाचाराला लगाम,आश्वासने नको उत्तर हवे, अशा बॅनरखाली राष्ट्रवादीने महापालिकेवर ‘जवाब दो’ मोर्चा काढला.