पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील भूखंड वाचवण्यासाठी शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज भेट घेऊन साकडे घातले. आज सकाळी विधान भवन मुंबई येथे मारुती भापकर, सचिन चिखले, भाऊसाहेब आढागळे, धनाजी येळकर पाटील, गणेश भांडवलकर, संतोष वाघे यांनी अजित पवार यांच्या सोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सर्व माहिती घेतल्यानंतर अजित पवार यांनी तत्काळ त्यांचे खाजगी सचिव श्री. मुसळे यांना पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना फोन लावण्यास सांगितला. अजित पवार यांनी ही जागा पिंपरी चिंचवड शहरातील ओळख असणाऱ्या भक्ती शक्ती शिल्पसमूहालगत असून या जागेवर शिवजयंती उत्सव, लोकशाहीर आण्णाभाऊ जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात होतात. खरे तर अशा पालखी मार्गालगत राखीव ठेवल्याच पाहिजे. पुढे जर अशा जागा ठेवल्या नाही तर सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम पुढे कसे होणार? भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड शहरात हा विषय संवेदनशील होऊ शकतो. त्यामुळे मी आमचे खाजगी सचिव श्री चौबे यांना आपल्याकडे या समितीच्या कार्यकर्त्यांन सह पाठवत असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. व ही जागा सार्वजनिक उपक्रमाकरिता राखीव रहावी. यासाठी आपण प्रयत्न करावा अशी सूचना अजित पवार यांनी महिवाल यांना केली.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे..
१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पीएमआरडीए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.
२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पीएमआरडीएने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.
३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.
४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.
५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा.
६) मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करण्यात यावा.
७) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” आदि कार्यक्रम याच जागेत व्हावा.
८) जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पालखी विसाव्यासाठी या जागेचा वापर व्हावा.