पिंपरी (Pclive7.com):- मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे ‘खासदार आपल्या भेटीला’ या अभियाना अंतर्गत मतदार संघातील विविध भागांमध्ये जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुशंघाने नवी सांगवी परिसरामध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती बारणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
यावेळी महापालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांनी असंख्य तक्रारी केल्या. नवी सांगवी परिसरामध्ये भाजी विक्रेते व छोटे व्यावसायीक रस्त्यावरती आपला व्यवसाय करीत असून नागरिकांना वाहतुकीसाठी यांचा त्रास होतो. त्यातच असंख्य वाहने रस्त्यावर पार्किंग केली जातात. भाजी मंडईची सुविधा नसल्याने नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या वतीने या भागात महिलांसाठी व्यायाम शाळा असावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शास्तीकर पूर्णतः माफ व्हावा व शास्तीकर माफी साठी आपण लढा द्यावा अशी मागणी खासदार बारणे यांच्याकडे नागरिकांनी केली. सांगावी भागात असलेले पोलीस स्टेशन सोसायटीच्या इमारतीमध्ये असल्याने सोसायटीच्या नागरिकांना याचा त्रास होत असून सदरच्या पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यासाठी सुविधा नसल्याचे स्थानिक महिलांनी निदर्शनास आणून दिले. या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने विविध भागात जावून समस्या जाणून घेत आहे. त्याचा भाग म्हणून नवी सांगवी परीसारामध्ये काल नागरिकांच्या भेटी घेतल्या असता महापालिकेच्या कारभारा विषयी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून पाणी, कचरा, ड्रिनेज, रस्तेदुरुस्ती, वाहतूक समस्ये बरोबरच भाजी विक्रेत्यांचा होणारा त्रास या मुलभूत समस्यांच्या अधिकाअधिक तक्रारी नागरिकांनी केल्या असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे.
तसेच अनधिकृत बांधकाम नियमित करण्याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम अवस्था असून शास्तीकर पूर्णतः माफ व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. एकूणच सत्ताधारी पक्षा विषयी प्रचंड असंतोष सर्वसामान्य माणसामध्ये जाणवत अाहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड मतदार संघातील विविध भागात जावून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन महापालिका आयुक्त व संबंधित विभागाच्या प्रमुखांस नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी भाग पडणार असल्याचे बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.