मनसेच्या वतीने महापालिकेत निदर्शने
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोशी या ठिकाणी नवीन क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे, यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे. त्याच प्रमाणे महानगरपालिकेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. याला सुद्धा मनसेने विरोध दर्शवला आहे. दररोज पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका आवारात झालेल्या या आंदोलनास अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे रुपेश पटेकर, विशाल मानकरी, नितीन चव्हाण, प्रतीक शिंदे, आकाश सागरे देवेंद्र निकम नारायण पठारे शिरीष महाबळेश्वर, विशाल साळुंके, काशिनाथ खजुरकर, सत्यम पत्रे, अलेक्स आप्पा मोझेस, जयसिग भाट,मयूर चिंचवडे , प्रतीक वाळुंज, अक्षय कदम, प्रफुल्ल गोपनारायण, सचिन मिरपगार, सुरेश सकट, शिवकुमार बायस, श्रावण ठाकूर, विपुल काळभोर , सोमनाथ काळभोर, जय सकट, प्रदिप घोडके व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
त्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले होते की, शहरांमधील अण्णासाहेब मगर स्टेडियम अनेक दिवसापासून धूळ खात पडलेले आहे. याच स्टेडियमचे अनेक दिवसापासून काम रखडलेल्या अवस्थेत आहे. शहरातील अनेक क्रीडांगणे मोठ्या प्रमाणात त्याची दुरावस्था झालेली आहे. याकडे महानगरपालिकेचे कोणतेही लक्ष नाही, मोठ्या प्रमाणात या क्रीडांगणावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. एवढा खर्च करून सुद्धा सर्व क्रीडांगणाची अवस्था बिकट आहे. मध्यंतरी हीच सर्व क्रीडांगणे प्रायव्हेट व्यक्तीस चालवण्यासाठी प्रशासन घाट घालत होता. हे सर्व असताना नव्याने एवढा मोठा खर्च करून क्रिकेट स्टेडियम कशाला? प्रथमता शहरातील सर्व क्रीडांगणे व्यवस्थित व चांगल्या दर्जाची करून शहरातील सर्व क्रीडापटूंना वापरण्याजोगी करून देण्यात यावी, अण्णासाहेब मगर स्टेडियमचे डेव्हलपमेंट करावे. आज शहरात नव्याने महानगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी सुद्धा मोठा निधी वापरण्यात येणार आहे. सध्या स्थितीला नागरिकांची व शहरवासीयांची ही गरज नाही.
मागील अनेक दिवसापासून शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना, महिला वर्गांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जास्त प्रेशरने पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी खूप कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक सोसायटीमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तरी नागरिकांची गरज लक्षात घेता पाणीपुरवठा विभागास निधी उपलब्ध करून द्यावा.
प्रशासनाने बंद पडलेली पवना जलवाहिनी लक्ष देऊन चालू करावी व शहरवासियांना रोज पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. शहरातील नागरिकांची प्रथम गरज हि दररोज पाणीपुरवठा झाला पाहिजे अशी आहे. तरी त्वरित पाणीकपात रद्द करून शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा सुरू करावा यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.