पिंपरी (Pclive7.com):- उत्तर भारतामध्ये कार्तिक मास शुक्ल पक्षाच्या चतुर्थी पासून सप्तमी पर्यंत चार दिवस छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी व्रत करणारे प्रथम स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी भोपळा, भात, चना डाळ यापासून शाकाहारी भोजन बनवले जाते. दुस-या दिवशी निरंकार उपवास करून सूर्याची पूजा केली जाते. आणि उसाचा रस किंवा गुळ टाकून तांदळाची खीर करून त्यात तूप टाकून त्याची रोटी बनवतात व या रोटीचा प्रसाद तयार केला जातो. त्यानंतर ३६ तासांचा निरंकार उपवास असतो. तिस-या दिवशी प्रसाद बनवला जातो आणि सजवलेल्या टोपलीतून सायंकाळी घाटावर घेवून जातात. व्रत्त करणारे सदस्य पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य देतात. चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला नदीत पाण्यात उभे राहून अर्घ्य देवून सूर्यदेवाला घरामध्ये सुख शांती लाभावी यासाठी आराधना करून प्रसाद वाटून छट पुजेची समाप्ती केली जाते.
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराशेजारील असलेल्या पवना नदीच्या घाटावर नाना काटे सोशल फौंडेशन व उत्तर भरतीय क्षत्रिय समाज यांच्या वतीने उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र असणारा छठपूजेचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता तथा नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांच्या हस्ते छठपूजन करण्यात आले.
यावेळी उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने पुणे रेल्वे मंडळचे ADRM श्री.ब्रिजेश कुमार सिंग, ACP श्री.विवेक मुगळीकर, सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.रामचंद्र गडाख यांचा सन्मान करण्यात आला. व सन्माननीयांनी उत्तर भारतीय नागरिकांना छठ पूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवशंभो सेवा मंडळाचे पदाधिकारी व उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे ब्रिजेश सिंग, दुर्गेश सिंग, श्री.राकेश गुप्ता, अमरजित सिंग, श्याम सिंग, सुनीलकुमार सिंग,सारंग सिंग, कान सिंग शेखावत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.