“मावळ” आणि “शिरूर” मतदारसंघातील प्रचार आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी सुराणा यांचे पदाधिकाऱ्यांना मागदर्शन
पिंपरी (Pclive7.com):- मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात प्रत्यक्ष भाजप लढत नसले, तरी महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असणार आहे. “अब की बार ४०० पार” खासदार निवडून आणण्यासाठी महायुतीचा विजय होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील १५ दिवस जोमाने काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी केले.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्याअनुषंगाने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी गुरुवारी पक्षाच्या मोरवाडी येथील कार्यालयात आढावा बैठक घेतली. बुथ बांधणी आणि प्रचार नियोजनाची त्यांनी माहिती घेतली. तसेच महायुतीच्या विजयासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना केल्या. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या नियोजनाबद्दल सुराणा यांनी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह सर्व कार्यकारिणीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्र प्रथम ही शिकवण दिलेली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची त्यांनी गॅरंटी दिली आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षे देशासाठी महत्त्वाचे आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर ७० वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार आणि घरोघरी पाईपद्वारे गॅस जोडणी ही मोदी सरकारची गॅरंटी आहे. या गॅरंटीवर जनतेचाही विश्वास आहे. हा विश्वास जिंकण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
शंकर जगताप म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात १७ मार्च रोजी निवडणूक जाहीर झाली. इतिहासात पहिल्यांच यंदाच्या लोकसभा निवडणुकीने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, ही जागतिक इच्छा आहे. मावळ आणि शिरुर लोकसभेच्या महायुतीच्या विजयासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभेनुसार ५-७ बैठका घेण्यात येत असून १० ते १५ हजार नागरिकांसोबत संवाद साधण्यात येत आहे. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. नागरिकांना मोदी यांचे धोरणे पटवून देत महायुतीच्या उमेदवारांना तीनही विधानसभा मतदार संघातून लाखोंचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार महेश लांडगे, आश्विनी जगताप, उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक माऊली थोरात, राज तापकीर, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर यांच्यासह माजी नगरसेवक, शक्ति केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.