पिंपरी (Pclive7.com):- गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इथल्या उमेदवाराला आम्ही घाटाखालून पंचवीस हजारांचे मताधिक्क्य दिले होते. आता तर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या सोबत शेतकरी कामगार पक्ष आहे. आम्ही शब्दाला पक्के आहोत. या निवडणुकीत घाटाखालील तीन मतदारसंघातून पार्थ पवार यांना मोठे मताधिक्क्य देऊ असा विश्वास शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
थेरगाव येथे एका हॉटेलमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शेकापचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरिष मोरे, उपाध्यक्ष भालचंद्र फुगे, महिला अध्यक्षा छाया देसले, शहर संघटक सुभाष साळुंके, संतोष जंगम, राहुल पोकळे, सागर आल्हाट, माजी नगरसेवक सतिश दरेकर, राहुल पडवळ, राजेंद्र देवकर, संजय साळुंखे, सारिका फुगे, मालन बनपट्टे, संजय भालके, अशोक इंगळे, सिता जगताप आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाने महाआघाडीला पाठींबा दिला आहे. आघाडीचा एक घटक म्हणून या निवडणुकीत आम्ही काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहिलो आहोत. घाटाखालील तीन मतदारसंघातून त्यांना मोठे मताधिक्क्य देणार आहोत. गेल्यावेळेस मोदी लाटेतही इथल्या उमेदवाराला आम्ही घाटाखालून २५ हजारांचे मताधिक्क्य दिले होते. आता तर घाटाखाली शेकापचे सुमारे पावणे चार लाख मतदान आहे. कोणी पक्ष सोडून गेले तरी काहीच फरक पडत नाही. शेकाप हा केडर पार्टीचा पक्ष आहे. शेकापचे २ हजार प्रशिक्षीत कार्यकर्ते आहेत. शब्दाला आम्ही पक्के आहोत. पार्थ पवारांना तीन मतदारसंघातून मोठे मताधिक्क्य मिळवून देऊ असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील कुठलेही प्रश्न युतीला सोडवता आले नाहीत. अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न सुटलेला नाही. रिंगरोडमुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. राज्य, केंद्राशी निगडीत अनेक प्रश्न जैसे थे आहेत. स्वच्छ शहर म्हणून पिंपरी चिंचवडची पूर्वी ओळख होती. राष्ट्रवादीच्या काळात स्मार्ट सिटीचा शहराला पुरस्कार मिळाला होता. मात्र आता सत्तांतर झाल्यामुळे शहराची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. खासदार म्हणून पार्थ पवार हे या मतदार संघाचे प्रभावीपणे काम करतील. श्रीरंग बारणे यांनी संसदेत नुसते प्रश्न मांडलेत. परंतू किती प्रश्न सुटलेत हाच मोठा प्रश्न आहे. संसदेत हिंदी आणि इंग्रजी भाषा गरजेची आहे. या मतदार संघातील प्रश्न बारणेंपेक्षा पार्थ पवारच प्रभावीपणे संसदेत मांडतील आणि सोडवतील सुध्दा असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.