पुणे (प्रतिनिधी):- सरकार आणि मोदींच्या विरोधात फेसबुकवर लिखान केल्यानंतर काही पत्रकारांना आणि व्यक्तींना नोटीसा देऊन पोलिसांमार्फत चौकशी करण्यात आली. अशा प्रकारे लिखानाबद्दल नोटीसा देऊन चौकशीला बोलावणे हे दुदैवी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. सरकारने २०१९ सालच्या निवडणुकांपर्यंत देशात आणीबाणी लागू करू नये म्हणजे झालं, असे मत ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
पुणे पत्रकार संघातर्फे आज आयोजित केलेल्या सांस्कृतिक कट्ट्यावर फुटाणे बोलत होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. हा कवीकट्टा कवितेच्या आठवणी आणि विविध आठवणींने रंगला.
रामदास फुटाणे म्हणाले, सध्या राजकीय क्षेत्राकडे जगण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे. गेली तीस वर्षे विविध जातींच्या नेत्यांना सांभाळण्यात आणि गोंजारण्यात गेली आहेत. जात जाण्यापेक्षा ती आणखी घट्ट होत आहे. मंडल आयोगानंतर सर्व जाती बळकट होण्यास सुरूवात झाली. मोठ-मोठ्या शहरात जात पाहण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात जातीयवाद आहे. प्रकाश आंबेडकर यांनीच फक्त शाळेच्या दाखल्यावरील जात काढावी अशी मागणी केली होती. हे धाडस कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही. जो तो जातीच्या भिंती घट्ट करून त्याचा फायदा उठवतात. राज्यकर्ते घाशीराम कोतवाल पाळतात, आणि कार्यकर्त्यांचा बळी घेतात.
वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे लहानपणापासून काँग्रेसच्या विचारात रमलो. मी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर फिरत असलो तरी, मी काँग्रेसच्याच विरोधात लिहीत होतो. मी नेत्यांना काही मागितले नाही, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात लिहू शकलो. नेत्यांच्या जास्त जवळ गेल्यावर अनेक गोष्टी कळत गेल्या. मात्र लिहीताना काही पत्त्य पाळावी लागतात, ती मि पाळली. सुशिलकुमार शिंदे हे सर्वप्रथम मित्र झाले. त्यानंतर इतर नेते मित्र झाले. एकही रुपाया न खर्च करता आमदार झालेला मी शेवटचा आमदार आहे, हे फक्त शरद पवार यांच्यामुळे झाले. आज कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.?असे सांगत फुटाने यांनी अनेक किस्से आणि कवीता उपस्थितांना सांगितल्या.