पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगारासाठी देश आणि राज्यातून नागरिक येतात. त्यातील एक गजानन बाबर हे एक होते. पैश्यासाठी नाही, तर दोन वेळेचे जेवण व रात्रीच्या निवारासाठी ते रेशन दुकानात काम करत. सर्वसामान्याच्या संकटाच्या काळात ते संकटमोचक म्हणून धावून जात. प्रतिकूल प्रतिपरिस्थितीत त्यांनी सर्वसामान्यांसाठी संघटना उभी केली. नागरिकांची छोटी-मोठी कामे करीत, त्यांच्याशी सुसंवाद वाढवत सामाजिक कार्यास सुरुवात केली. ते नगरसेवक, आमदार व खासदार झाले. त्याची संघर्षमय कथा सांगणारे हे पुस्तक नव्या पिढीस प्रेरणा देणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी सोमवारी (दि.२६) केले.
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनावरील ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झाले, या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, भगवान वाल्हेकर तसेच, सूरज बाबर, प्रकाश बाबर, धीरज बाबर, अमित बाबर, योगेश बाबर, सुमीत बाबर आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन मोठे नेते महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी सर्वसामान्य तरुणांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे कर्तृत्व समाजासमोर आणले. बाळासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे गजानन बाबर घडले. बाबर यांनी सामाजिक बांधिलकी कधी सोडली नाही.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, की दिल्लीसमोर झुकणाऱ्यांचा नाही, तर छाती पुढे करून लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही. तो आजही छातीचे कोट करून उभा आहे. आजही महाराष्ट्र संघर्षासाठी तयार आहे आणि तो युद्ध जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही.
लोकसभा निवडणुकीत विलास लांडे हे अमोल कोल्हेंचे पाठीराखे होतील..
माझी कंपनी असून, तेथे ३ हजार जण काम करतात, असे विलास लांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तो धागा पकडून शरद पवार यांनी त्यांच्यावर गुगली टाकली. लांडे यांची इतकी मोठी कंपनी असल्याचे आजच मला कळाले. त्यामुळे माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाले आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीसाठी निधीची कमतरता होती. त्याच्या पुरवठ्याची काळजी आता मिटली आहे. ते ती बाजू सांभाळून कोल्हेंचे पाठीराखे होतील, असे शरद पवार यांनी जाहीर करताच सभागृहात एकच हश्या पिकला.
दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही..
सन १९७२ पासून शिवसेनेत असलेल्या गजानन बाबर यांनी कायम संघर्ष केला. ते आज हयात असते तर, आताही त्यांना संघर्ष करावा लागला असता. कोणासमोर वाकणार नाही, झुकणार नाही, मोडणार नाही अनं स्वतःला विकणार नाही, ही बाळासाहेबांची शिकवण शिवसैनिकांमध्ये भिनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात २३ किल्ले दिले. शिवसेनेने ४० व शरद पवारांचे ४० आमदार तिकडे गेले. काँग्रेसचा १ आमदार गेला. आता ८१ नाही, तर तब्बल १८१ आमदार घेऊ, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.