पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण ९१ टक्के भरले आहे. धरणातून आज दुपारी १ वाजता ३२०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना धरण सद्यस्थितीत ९१ टक्के भरलेले असून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी १ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून १८०० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण ३२०० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.