पिंपरी (Pclive7.com):- बाळंतपणात पहिले अपत्य गमावल्याचे दुःख उराशी होते. अनेक वर्षांनी पत्नी गर्भवती राहिली अन खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने वायसीएम रुग्णालयात नोंदणी केली. अचानक पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने चाकणहून थेट वायसीएम गाठले. मात्र डॉटरांनी बिना तपासताच दिलेल्या तारखेलाच या असे सांगत खडसावले. तर दुसरीकडे अर्जंट लिहले असतानाही रुग्णालयाने गर्दी असल्याचे सांगत सोनोग्राफी टाळली. पोटात कळा घेऊनच तिने पुन्हा चाकण गाठले. वेदना सहन करत रात्र गेली अन सकाळी ती घरातच बाळंतीण झाली. रुग्णालयात आणेपर्यंत त्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला होता अन आईसुद्धा अर्धमेली झाली होती. अन ‘गरिबाला वाली नसतो’ असे म्हणत ते वडील हातात मुलाचे शव घेऊन न्यायासाठी फिरत होते.
तीस वर्षीय रोशन विश्वकर्मा चाकणमधील खराबवाडी परिसरात राहतात. एका खासगी कंपनीत फॅब्रिकेशनचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्याची पत्नी गर्भवती राहिल्याने तिची पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यांना २५ मार्च ही बाळंतपणाची तारीख देण्यात आली होती. दरम्यान बुधवारी (दि.२१) तिला पोटात वेदना होऊ लागल्या यामुळे रोशन यांनी तिला रुग्णालयात आणले. मात्र संबंधित विभागातील एका महिला डॉक्टरने वेदना होत असूनही तिला योग्य प्रकारे न तपासता दिलेल्या तारखेलाच या असे सांगितले.
दरम्यान रोशन हे सोनोग्राफी विभागात गेले असता त्यांना गर्दी असल्याने पुढची तारीख देण्यात आली. नाईलाजाने त्यांना आहे त्याच अवस्थेत घरी परतावे लागले. दरम्यान घरी आले असता पत्नीची प्रकृती आणखी बिघडली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पत्नी बाळंतीण झाल्याचे रोशन यांना दिसले. त्यांनी त्वरित तिला परिसरातील एका रुग्णालयात नेले. तेथून तिला पुन्हा वायसीएममध्ये पाठवण्यात आले. रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी नवजात मुलाला मृत घोषित केले. विशेष म्हणजे त्यांचा पहिला मुलगाही बाळंतपणात गेला होता. मात्र यावेळी सामान्य प्रसूती असतानाही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगा गेल्याचे रोशन यांनी सांगितले. माझा मुलगा आता परत येणार नाही मात्र हा प्रकार इतरांसोबत होऊ नये अशी विनंती करताना त्यांना अश्रू अनावर झाले.