पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभाराची परिस्थिती दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी चाललीय, हे म्हणतील तिच पूर्व दिशा, यांना विचारणारं कोणी नाही. शहराचा विकास थांबलायं, कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. कचर्याचा प्रश्न गंभीर झालायं, दादागिरी वाढलीय. या आमदारांनी ४ वर्षात काय काम केलंय असा सवाल करत महेश लांडगे आणि लक्ष्मण जगतापांवर नाव न घेता हल्लाबोल केला.
काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, खोटं बोलून ही मंडळी सत्तेत आली. ४ वर्षात इथल्या आमदारांनी शहरासाठी काय केलं, कोणतचं विकासाच काम केले नाही. केवळ राष्ट्रवादीने केलेल्या भूमिपूजनांच्या कामांची उद्घाटने यांनी केलीत. वर्षभरात त्यांनी केलेल्या प्रत्येक कामावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. करचा उचलण्याचं टेंडर आज भ्रष्टाचाराच्या आरोपामुळंच रद्द झालं. शहरात आज कचर्याची समस्या भयानक झालीयं. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलयं. गुन्हेगारी वाढली आहे. वाहने तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वत्र दादागिरी पसरत चालली आहे. पाण्याची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. मुळातच काम करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. परंतू दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा आहे. यांना कुणीच विचारत नाही.






















Join Our Whatsapp Group