पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण पाणलोट क्षेत्रात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात ७५.६९ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. आज (दि.०६) दुपारी २.३० वाजल्यापासून धरणातून १६०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरी मावळ, पिंपरी चिंचवड मधील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७५.६९ टक्के एवढे भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.

धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने ८०० क्युसेक्स मुक्त विसर्ग करण्यात येत आहे. तरी, आज (दि.०६) दुपारी २.३० वाजता पाणलोट क्षेत्रातील येव्यानुसार सांडव्यावरील विसर्गामध्ये वाढ होऊन एकुण विसर्ग १६०० क्युसेक्स इतका राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group