
चिखली (Pclive7.com):- अंगणवाडी रोड व चिंचेचा मला ते वाघू साने चौक हा चिखली परिसरातील प्रमुख मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक यांना रोज त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा संपूनही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने अखेर येथील नागरिकांनी युवा नेते यश साने यांच्या नेतृत्वात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

तसेच दिवाळीच्या आधी रस्ता नाही झाला तर जनआंदोलन करण्यात असाही इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित विभागाशी समन्वय साधून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यश साने यांना दिले आहे.

महापालिका आहे ग्रामपंचायत नाही..
रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो बॅनरवर छापून अंगावर अडकवून आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बॅनरवर ठळक अक्षरात लिहिले होते “पालिका आहे, ग्रामपंचायत नाही!” त्यासोबतच “खड्डे की रस्ते?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी यश साने यांच्या सोबत रुपेश मोरे, विनायक बनसोडे, रुषी साने, रोशन पाणमंद, गणेश शिंदे, अशोक पवार हे ही आंदोलनात सहभागी झाले होते.

अंगणवाडी रस्ता व चिंचेचा मळा ते वाघू साने चौक हा संपूर्ण रस्ता तातडीने नव्याने डांबरीकरण करावा. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे काम पूर्ण झाले असून आता कोणतीही अडचण उरलेली नाही. तरीही काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवाळीपूर्वी रस्ता डांबरीकरण झाला नाही, तर आम्ही मोठे जनआंदोलन करू. प्रशासन झोपेत असेल तर आम्ही त्यांना जागे करू.
– यश साने, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस