पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शहरातील सर्व विरोधी राजकीय पक्ष एकत्र येऊन आज ‘घंटानाद’ आंदोलन केले. पिंपरी महापालिका मुख्यालयासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत ‘शंखनाद’ आणि ‘घंटानाद’ आंदोलन करून विरोधकांनी लक्ष वेधले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शाम लांडे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, काँग्रेस सेवादलाचे संग्राम तावडे, स्वराज अभियानचे मानव कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मारूती भापकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर गेली साडे चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात चार वेळा आले आहेत. मात्र, प्रत्येकवेळी त्यांनी हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. ९ जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात त्यांनी हा प्रश्न पंधरा दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत २४ तारखेला संपली आहे. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करून मुख्यमंत्री आणि सत्ताधारी भाजपचा तीव्र निषेध करत आहोत.
घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.. या फडणवीस सरकारचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.