पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शिवाय पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आली आहे.

गेल्या काही तासांपासून पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यामध्ये धरणातून विसर्ग देखील केला जात आहे. विशेषत: पवना धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज रात्री ८ वाजता सुमारे ७ हजार क्युसेक इतका विसर्ग या धरणातून पवना नदीपात्रात करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण अवलंबुन असल्याचे पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासर्व बाबी विचारात घेता महापालिकेच्या सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागल्यास त्याठिकाणी भोजन, वैद्यकीयसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जलद प्रतिसाद पथकाने दिवसरात्र नदीकाठ परिसरावर लक्ष ठेवावे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांशी समन्वय साधून त्याभागातील आपत्कालीन परिस्थिती हाताळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसह आपत्कालीन पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा नियमित आढावा घेत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पवना धरण सध्या सुमारे ९७ टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने आज शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रातील विसर्ग ५,६०० क्युसेकवरून वाढवून ७,००० क्युसेक केला आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ९,००० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असून, त्याबाबतची माहिती वेळोवेळी जलसंपदा विभागाकडून देण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाले व ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊन नदीकाठच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पवना नदी खोऱ्यातील नागरिक, शेतकरी यांनी सतर्क राहावे, नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप व जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पवना धरणातून विसर्गही वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेला महापालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असून, सर्व यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहेत.– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“सध्याची परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नदीकाठच्या सखल भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे, अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



















Join Our Whatsapp Group