पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपच्या नगरसेविका जयश्री वसंत गावडे यांनी चुकीच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे निवडणूक लढविली आहे. यामुळे महापालिकेची, शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप कार्यकर्ते आशिष मोरेश्वर गावडे यांनी एका पत्रकाव्दारे केला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निवेदन देवून या प्रकरणाची व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे
याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, २०१२ व २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी गावडे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेली शपथपत्रे व इतर कागदपत्रांची मागणी मी केंद्रीय माहितीचा अधिकार २००९ अंतर्गत महापालिका निवडणुक विभागाकडे ६ डिसेंबर २०१८ रोजी केली होती. मात्र, २०१२ सालचे रेकॉर्ड महापालिका अधिनियमातील नियम ४१ व ४२ प्रमाणे नष्ट करण्यात आल्याचे सांगितले. २०१७ मधील दिलेल्या माहितीनुसार गावडे यांनी शैक्षणिक पात्रतेसाठी महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा (पुणे) शाळा सोडल्याचा दाखला जोडला आहे. त्यावर शाळा सोडल्याचे कारण रकान्यामध्ये सतत गैरहजर याबाबीवरून नाव कमी आणि आठवी अनुतीर्ण असा शेरा आहे. मात्र, महापालिका निवडणूक लढविताना नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रातील शैक्षणिक अर्हता रकान्यात दहावी उत्तीर्ण-अण्णासाहेब कर्वे शिक्षण संस्था हिंगणे असा उल्लेख केला आहे. तसेच आठवी अनुतीर्णचे साल एप्रिल १९८७ आणि १९८९ असे आहे.
दहावी उत्तीर्णचा दाखला खोटा आहे. कारण १९८७ साली आठवी अनुतीर्ण असेल तर दहावी १९८९ कसे काय? पुन्हा आठवीची परिक्षा दिली असेल तर एक वर्षाचा फरक दोन्हीमध्ये असायला हवा होता. याचमुळे गावडे यांनी शासनाची, महापालिकेची व जनतेची फसवणूक केल्याचे सिद्ध होत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकाच्या प्रति त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांना पुराव्यासह पाठविल्या आहेत. तसेच गावडे यांनी हा विश्वासघात केला असून शाळा सोडल्याच्या दाखल्याची समूळ चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.