पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील पाचवर्षात देशात अनेक लोकाभिमुख विकासकामे झाली आहेत. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच दैदिप्यमान कामे झाली आहेत. पाच वर्षाचे काम बघून जनता मोदी यांना साथ देणार आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवावीत. पुणे जिल्ह्यातील आपले चारही उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी युतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील अशा विश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना-भाजपमधील कटुता संपली असून कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून येईल, असेही ते म्हणाले.
पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज (मंगळवारी) आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी बापट बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे, महापौर राहुल जाधव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष, आमदार बाळा भेगडे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य अमित गोरखे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्यासह शिवसेना-भाजप नगरसेवक, नगरसेविका आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
”शिवसेना-भाजपचे भांडण नव्हते. दोन्ही पक्षांनी ताकद वाढविली. त्यात काहीही गैर नाही” असे सांगत बापट म्हणाले, ”खुप दिवसांनी दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद होत आहे. युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. मतभेद संपले आहेत. भविष्यात एक कुटुंब म्हणून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. आता सर्वांनी एकदिलाने, एका मनाने कामाला लागायचे आहे. सरकारचे प्रत्येक योजना, काम घेऊन नागरिकांपर्यंत पोहचायचे आहे”.
”नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाला स्थिर, काम करणारे सरकार द्यायचे आहे. काँग्रेसने 70 वर्षात काहीच केले नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने आणि महाराष्ट्रातील युती सरकारने तेवढी विकास कामे केली आहेत. फक्त पुणे जिल्ह्यात 60 हजार कोटी रुपयांची विकास कामे चालू आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही ओरडू द्या. आपल्याला फरक पडणार नाही”, असे बापट म्हणाले.
”भाजप-शिवसेना पैशावर, जातीवर, धर्मावर निवडणूक लढवित नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढविते. युतीचा आत्मा कार्यकर्ता आहे. आपले कार्यकर्ते तळमळीचे आहेत. विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याशिवास स्वस्थ बसणार नाहीत. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. निवडणूक आपण जिंकणार आहोत. पण गाफील राहयाचे नाही. सहज घ्यायचे नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचायचे आहे. उमेदवार कोण आहे, हे पाहू नका, युतीचा उमेदवार आहे, हे पाहून काम करा” असेही बापट म्हणाले.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात सक्रिय असल्याचे सांगत शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे म्हणाल्या, ”काँग्रेस-राष्ट्रवादीला 15 वर्ष जे करता आले नाही ते युती सरकाराने साडेचार वर्षात केले. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिले. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवावित. राष्ट्रवादीला कुटुंबातील उमेदवार द्यावा लागला. त्यातून त्यांची हतबलता दिसून येते. मावळात शेतक-यांचे रक्त सांडले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शेतक-यांशी पुतना मावशीचे प्रेम समोर आले आहे”.
”आजपर्यंत झालेली टीका गंगेला मिळाली आहे. दोघांचे भांडण मिटल्यावर लोकांना आनंद होतो. तसेच युतीचे भांडण संपल्यावर जनतेला आनंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनापासून काम करण्याचे” आवाहन गो-हे यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी 2014 साली प्रचंड मेहनत घेऊन मला संसदेत पाठविले. लोकांची सेवा करण्याची संधी दिली. संसदेत जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. जनतेची कामे करणारा, लोकांमध्ये मिसळणारा, प्रश्न सोडविणारा खासदार अशी प्रतिमा निर्माण केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठदिवसांपुर्वी मावळात काम सुरु करण्याचा आदेश दिला आहे. चार दिवसांपुर्वी पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील बारणे हेच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर देशाचे नाव कोरले आहे. कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. देशाला अधिक बलशाली करणारी ही निवडणूक आहे. आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. देशाला, राज्याला नवा इतिहास द्यायचे काम मावळमध्ये नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मावळात राष्ट्रवादी राहिली नाही. शहरातून हद्दपार झाली आहे. ज्यांना शहरातून हद्दपार केले आहे. त्यांना पुन्हा शहरात येऊ द्यायचे नाही, असेही बारणे म्हणाले. यावेळी बाळा कदम, बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group