पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेअंतर्गत मोदी यांनी आज (रविवार) पिंपरीतील मोरवाडी येथील भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापालिका सभागृह नेता एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, उमा खापरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.
मी कधीही जनतेच्या पैशावर ‘हात’ पडू देणार नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे. समाजासाठी काम करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे, असे मोदी म्हणाले. काही लोकांचा बौध्दीक विकास झालेला नाही. देशातील जनता चौकीदाराच्या पाठीशी आहे. बालाकोट हल्ला मी नाही तर देशाच्या सैनिकांनी केला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी देखील काही लोक पंतप्रधानाच्या रांगेत उभे होते. यावेळी ती रांग थोडी मोठी झाली आहे. एखादा निर्णय घेताना नफा-तोटा याचा विचार करुन देश चालवायचा असता, तर या देशात मोदी पंतप्रधान बनायची गरजच नव्हती, असे ते म्हणाले. संपूर्ण बहुमत असलेले सरकार देशासाठी खूप मोठी ताकद असते. जगात भारताचा आवाज ऐकला जातो, त्याला मोदींपेक्षा हे संपुर्ण बहुमाताचे सरकार जास्त कारणीभूत आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.