पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवस साजरा करणे म्हणजे आता तरुणांमध्ये एक ‘क्रेझ’ झाली आहे. मात्र आपण समाजाचे काही देणे लागतो, याचे भान ठेवत संत तुकारामनगर येथील विशाल जाधव या तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळत गरीब गरजू रुग्णांना मदत केली आहे. युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन विशाल जाधव या तरुणाने हे सामाजिक कार्य केले आहे.
संत तुकारामनगर येथील युवा व्यवसायिक विशाल जाधव या तरुणाचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत, त्याने समाजउपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसानिमित्त त्याने गोरगरीब रुग्णांना, गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रूग्णांना फळे व लहान मुलांना खाऊ वाटप केले.
सध्या सगळीकडेच, चौका चौकात तरुण मुलं आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसतात. यामध्ये महागडा केक आणून तो मित्रमंडळी कापतात. पण केक कापल्यावर फक्त फोटो काढण्यापुरता केक चारताना दाखवला जातो. आणि त्यानंतर तो केक ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या तोंडाला फासला जातो. यामध्ये एकच गोष्ट होते ती आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी. पण यासर्व अनावश्यक गोष्टीला फाटा देत विशाल जाधव याने सामाजिक भान जपण्याचे कार्य केले आहे. त्याच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे म्हणाले की, सार्वजनिक जिवनात आपण पहात आहोत अनेक लोकांना एक वेळचं अन्न देखील भेटत नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझे संपूर्ण तरुणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, गोशाळा, अंध दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणे करून आपण सामाजिक भान जपण्याचे महान कार्य कराल.