पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण मावळ परिसरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात केवळ १३.३८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. २० जुलैपर्यंत पुरेल एवढेच पाणी धरणात असून आजपर्यंतच्या इतिहासात १३ टक्के एवढा कमी पाणीसाठा पहिल्यांदाच धरणात राहिला आहे. दरम्यान शहरवासीयांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मावळात असलेल्या पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर व मावळ परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. आज दि.२७ अखेर १३.३८ टक्के एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. धरणाची पाणी क्षमता १० हजार दशलक्ष घनमीटर आहे. पाण्याची पातळी १.७५ दशलक्ष घनमीटर एवढे आहे. महापालिकेने सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतर धरण साठ्यातील पाण्याची पातळी खालावल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पवना धरण परिसरात ९८ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला २९० मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरण क्षेत्रात अंत्यत कमी पाऊस झाला आहे. धरणात सध्या १३.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी केले आहे.