पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे. तसेच ६० कंत्राटी परिचारिकांची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू अाहेत. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर यांनी केला आहे. वायसीएम रुग्णालय तात्काळ आवश्यक त्या औषधांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आवश्यक तो कर्मचारीवर्ग तातडीने भरण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुलक्षणा शिलवंत-धर यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपचार होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पिंपरी चिंचवड, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात आल्यानंतर त्यांना चांगले उपचार मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र औषधांचा नेहमीचाच तुटवडा आणि डॉक्टर्स तसेच नर्सेसची कमतरता, यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण पाहता डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा अनेक महिन्यापासून दिसत आहे. त्यातच कंत्राटी पद्धतीवरील ६० महिला परिचारकांची मुदत संपली असून सध्या ७० नर्सेसची कमतरता येथे आहे. मुळात जुन्या कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन उपाय योजना करुन जाहिराती, परीक्षा आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे होते. पण अद्यापही नवीन कर्मचाऱ्यांची परीक्षा झाली नसून भरतीबाबत प्रशासन आणि सत्ताधार्यांकडे कोणतेच उत्तर नाही. त्यामुळे आणखी किती दिवस रुग्णांना ‘रामभरोसे’ राहावे लागणार असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.
पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून येथे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची पुरेशी खरेदी केली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच औषधांचा साठा अपुरा पडतो. कधीच औषध मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधे आणायला लावली जातात. त्यामुळे खाजगी औषध विक्रेत्यांचे खिसे भरण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जाणीवपूर्वक रुग्णांना औषध उपलब्ध करून देत नसल्याचा आरोपही नागरीक करू लागलेत.
उपचारासाठी सोयी सुविधांच्या अभावाने अनेकांना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे ते रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. वायसीएममध्ये ‘रेबीज’च्या लसीचा साठाही कमी पडत आहे. कुत्रा चावल्यानंतर अनेक जण ‘रेबीज’चे इंजेक्शन घ्यायला वायसीएममध्ये जातात, मात्र त्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. सध्या टायफाईड, डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील सर्वात मोठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वायसीएमकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. वायसीएम रुग्णालयात तात्काळ आवश्यक त्या औषधांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आवश्यक तो कर्मचारीवर्ग तातडीने भरण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.