पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात बोलल्या शिवाय कोणीही मोठे होत नाही. म्हणूनच राजकारणात मोठे होण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंंद्रकांत पाटील हे पवार साहेबांवर टीका करण्याचा बालिशपणा करत असल्याची जहरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिंचवडमध्ये केली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते शेखर ओव्हाळ आयोजित विविध मान्यवरांचा सन्मान त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडून आगीत अनेकजण होरपळून गेलेत. पावसाळ्यात इमारती कोसळून मृत्यूमुखी पडत आहेत. खड्ड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईची आजची परिस्थीती म्हणजे महापालिकेचे लक्ष नाही, तर राज्य सरकारचेही लक्ष नाही. भाजप आणि शिवसेनेने मुंबईला वाऱ्यावर सोडली आहे. केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार हाच सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम अाहे.
शरद पवार यांच्यावर टीका केल्या शिवाय कोणीही मोठे होत नाही. म्हणूनच राजकारणात मोठे होण्याचा बालिशपणा चंद्रकांत पाटील करत आहेत. एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे चंद्रकांत पाटील दावा करतात, पण गेल्या पाच वर्षात काही मतदार संघात आपल्याला उमेदवारही मिळत नाही हे कबुल करा असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. दरम्यान भाषण करताना महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य मुंडे त्यांनी बोलून दाखवले. शहराच्या विकासाची एक-एक विट शरद पवार आणि अजित पवार यांनी लावली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याना भरभरून द्या अशी साद ही त्यांनी पिंपरी चिंचवडकरांना घातली.