पिंपरी (Pclive7.com):- देशात नोटबंदी व जीएसटीमुळे उद्योगांवर परिणाम झाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. पवना धरण भरले तरीही लोकांना पाण्यासाठी ओरड करावी लागत आहे. कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा राग मतदारांनी मतदानातून व्यक्त करावा व पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांनी येथे केले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी प्राधिकरणातील खान्देश सभागृह येथे आयोजित बैठकीत माजी महापौर बहल बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, निलेश पांढारकर तसेच श्रीमंत जगताप, सचिन काळभोर, संजय लंके, अमोल भोईटे, रामभाऊ तावरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर बहल म्हणाले की, भाजपच्या वतीने 370 वे कलम रद्द केल्याचा गाजावाजा केला जात आहे. अवघ्या देशाने त्याचे स्वागतही केले आहे. मात्र, त्यामुळे देशातील अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन वयाच्या 80व्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बहल यांनी केले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदींची भाषणे झाली. या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावा यासाठी भोईर यांनी कार्यकर्त्यांना अनेक टिप्स दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शाहुनगर तसेच संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी परिसरात माजी महापौर मंगलाताई कदम यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढून पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते कुशाग्र कदम परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group