पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. असे प्रकार पुढेही सुरूच राहिल्यास खासगी जागांच्या मोबदल्यात महापालिकेच्या तिजोरीतील १००० ते १५०० कोटी रुपये द्यावे लागतील. परिणामी महापालिका भिकेकंगाल होईल. शहरातील प्रामाणिक करदात्यांना मुलभूत सोयी सुविधाही पुरविता येणार नाहीत. ही वेळ येऊ नये म्हणून नियमाचा गैरवापर करून खासगी जागा ताब्यात घेतल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी. अशा प्रकरणांत सहभाग किंवा समावेश असल्यास त्यांच्यावर महापालिकेची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे आजी व माजी सर्व नगरसेवकांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकत एकूण किती जागेत आहे आणि मिळकतकर किती जागेचा भरला जातो, हे जनतेसमोर ठेवावे. त्यामध्ये एखाद्या आजी माजी नगरसेवकाने अथवा त्याच्या नातेवाईकाने मिळकतकराची चोरी केल्याचे उघडकीस आल्यास संबंधिताचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा. सत्ताधारी नगरसेवक असला तरी पाठीशी न घालण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
यासंदर्भात सत्तरूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, “महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागतात. त्यासाठी जागांच्या मोबदल्यात संबंधित जागा मालकाला नुकसान भरपाई देण्यात येते. आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर २०१५ मध्ये खासगी जागा वाटाघाटीने ताब्यात घेण्याचा कायदा करण्यात आला. त्यानुसार तीन गुंठ्यांपर्यंतची जागा ताब्यात घेतल्यानंतर बाजारभावाच्या दुप्पट रक्कम आणि तीन गुंठ्यांपेक्षा जास्त जागा असल्यास ३० टक्के दिलासा रक्कम देण्यात येते. महापालिकेला जागा ताब्यात देणाऱ्या गोरगरीब सामान्य नागरिकांना त्याचा फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. कारण अनेक रस्ते, उद्याने व इतर विकासकामांमध्ये गोरगरीबांची गुंठा, दोन गुंठा जागा जात होती. अशा गोरगरीबांना जागेच्या मोबदल्यात दुप्पट फायदा करून देण्याचा हेतू होता. परंतु,काही जण या कायद्यातील नियमांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेकडून पैसे लाटता यावेत यासाठी जमिनींचे तीन-तीन गुंठ्यांचे तुकडे केले जात आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आता काही नगरसेवकांनी या नियमाच्या आधारे महापालिकेला लुटण्याचा उद्योगच सुरू केल्याचे उघड गुपित आहे. महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी भविष्यात लागणाऱ्या जागा विकत घ्यायच्या. त्या जागांचे तीन-तीन गुंठ्यांचे तुकडे करायचे. अशा जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात यासाठी प्रशासनावर दबाव आणायचा, असा प्रकार सुरू आहे. नगरसेवकांना महापालिकेची अशा प्रकारे लूट करता येते का?, हा खरा प्रश्न आहे. कारण नगरसेवक हा महापालिकेचा विश्वस्त असतो. नगरसेवकांनी महापालिकेचे नुकसान करता कामा नये हे कायद्यानुसार अभिप्रेत आहे. वास्तविक खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी टीडीआर, एफएसआय घेण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. परंतु,त्यासाठी आग्रह धरला जात नाही. तीन-तीन गुंठ्यांचे तुकडे करून बाजारभावापेक्षा दुप्पट रोख रक्कम घेऊन महापालिकेला आर्थिक संकटात आणले जात आहे. हे उद्योग पुढेही असेच सुरू राहिल्यास खासगी जागांच्या मोबदल्यापोटी महापालिकेच्या तिजोरीतील १००० ते १५०० कोटी रुपये द्यावे लागतील.
तसे झाल्यास महापालिकेला भिकेकंगाल व्हावे लागेल. तिजोरीत पैसेच उरले नाहीत तर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना मुलभूत सोयी सुविधाही पुरविता येणार नाहीत. हीच बाब जनतेसमोर येऊ नये असा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा डाव आहे. त्यामुळेच सोमवारी (दि. ६) झालेल्या सर्वसाधारण सभेत खासगी वाटाघाटीने जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आकांडतांडव आणि कांगावा केला. परंतु,यामागचे वास्तव काय? हे जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. विकास प्रकल्पांसाठी जागा ताब्यात देऊन त्या मोबदल्यात बाजारभावापेक्षा दुप्पट रक्कम घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व प्रकरणांची तसेच अशा मोबदल्यासाठी महापालिकेकडे आलेल्या प्रस्तावांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या नियमाच्या आधारे नगरसेवकांनी महापालिकेची लूट केली असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याही विरोधात स्वतः महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक असला तरी त्याला पाठीशी घालू नये.
कोणताही राजकीय पक्ष वाईट नसतो. परंतु,त्यामध्ये वाईट प्रवृत्ती असू शकतात. त्यामुळे महापालिकेच्या हितामध्ये कोणी बाधा आणत असेल, तर प्रसंगी स्वपक्षाच्या नगरसेवकांनाही आम्ही पक्षातून काढून टाकू. स्वतःच्या फायद्यासाठी कोणी सभागृह वेठीस धरत असेल, तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही. महापालिका साभागृहाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणाऱ्या नगरसेवकांचा उद्देश आम्ही कधीही सफल होऊ देणार नाही. महापालिका आणि महापौर या दोघांची गरिमा कायम राखण्याची सर्वच नगरसेवकांची जबाबदारी आहे. महापालिकेचे फायदे लाटण्यासाठी गाववाला आणि बाहेरवाला अशी विषमता पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. हे शहर संपन्न करण्यामध्ये सर्वांचाच वाटा आहे. या शहरात राहणारा प्रत्येकजण गाववाला आहे. केवळ आपल्या स्वार्थासाठी सभागृह बंद पाडले जाते हे प्रशासनाने चौकशीतून जनतेसमोर सत्य बाहेर आणावे.
त्याचप्रमाणे सर्व आजी माजी नगरसेवकांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचेही सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. नगरसेवकांची एकूण मिळकत किती जागेत आहे आणि प्रत्यक्षात महापालिकेला किती जागेचा मिळकतकर भरला जातो, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. अशा मिळकतींना पुरविण्यात आलेल्या पाण्याचे बिल महापालिकेला अदा केले जाते का? हेही तपासण्यात यावे. नगरसेवक हे जनतेला उत्तरदायित्व असतात. त्यामुळे आपले नगरसेवक मिळकतकर आणि पाणीबिल भरतात की नाही हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. नगरसेवकच महापालिकेची लूट करतात, असा जनतेचा समज झाला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. शहरातील सर्व मॉल, मंगल कार्यालये मोठ्या प्रमाणात मिळकतकराची चोरी करत असल्याचे अनेकदा प्रसारमाध्यांनी मांडलेले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे महापालिकेने नगरसेवकांच्या मिळकतींसह मॉल, मंगल कार्यालये व मोठ्या मिळकतींचे आणि प्रत्यक्षात भरल्या जाणाऱ्या मिळकतकराचे वास्तव जनतेसमोर मांडावे, अशी सूचनाही आयुक्त हर्डीकर यांना केल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले.