पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ही कष्टकऱ्यांचे शहर आहे. शहरात उपजिवेकासाठी आलेल्या नागरिकांनी पै-पै करुन घरे बांधली आहेत. त्या घरांना भरमसाठ शास्तीकराची आकारणी केली जाते. नागरिकांना हा दंड परवडणारा नसून थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. भाजप सरकारने सरसकट शास्तीकर माफीचे आश्वासन पाळले नाही. परंतु, आता महाविकास आघाडी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे शहरातील निवासी अवैध बांधकामांचा शास्तीकर मार्च महिन्यापूर्वी रद्द करावा अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
राहुल कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सध्या ५ लाख २४ हजार मिळकती आहेत. त्यापैकी ४ लाख ४५ हजार निवासी मिळकती आहेत. तर, ४५ हजार ८०० मिळकती बिगरनिवासी, ३७०० औद्योगिक मिळकती आहेत. याशिवाय ८ हजार ७०० मोकळ्या जागा असून ४ हजार ९०० इतर मिळकती आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ८६ हजार मिळकती या अनधिकृत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. प्रत्यक्षात मात्र २ लाखांच्यावर अनधिकृत बांधकामे आहेत.तत्कालीन भाजप सरकारने शास्तीकर माफीचा अर्धवट आणि फसवा निर्णय घेतला. शंभर टक्केशास्ती माफीचे आश्वासन पाळले नाही. केवळ एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांचा शास्तीकर माफ केला. याचा केवळ ५४ हजार ५३१ मिळकतींना फायदा झाला. त्यामुळे १९५ कोटींचा कर माफ झाला आहे. एक हजार स्क्वेअर फुटाच्यापुढे सुमारे १५ हजार मिळकती असून त्यांची थकबाकी २०९ कोटी रुपये आहे. शास्तीचा जिझिया कर सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. यावर २४ टक्के व्याजाने महापालिका दंड आकारत आहे. सावकारापेक्षाही हे व्याज अधिक आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारकडून शहरवासीयांना अपेक्षा आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापुर्वी अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर माफ करण्यात यावा. यामुळे कामगार, कष्टकऱ्यांना मोठा फायदा होईल. नागरिकांची या जाचक करातून सुटका करावी अशी मागणी गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.