पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या स्मार्टसिटीची कामे सुरू आहेत. यात सुमारे ५२० कोटींच्या निविदा काढल्या आहेत. त्या कामांत शहरातील भाजपा आमदारांनी संगनमत करून तब्बल कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी देशाचे स्मार्टसिटीचे प्रमुख कुणालकुमार व राज्याचे स्मार्टसिटीचे प्रमुख नितीन करीर तसेच अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रशांत शितोळे म्हणाले की, स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीच्या टेक महिंद्रा कंपनीला मिळालेल्या कामामध्ये कोट्यावधींचा घोटाळा केला जात आहे. एका पाणी मीटरची किंमत १ लाख ८ हजार येवढी आहे. तर, या कामासाठी लागणाऱ्या जनरेटरची बाजारातील किंमत २५ लाख असून महापालिकेकडून हा जनरेटर ३ कोटी रुपयांना खरेदी केला जाणार आहे. याकामासाठी ५१५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर, ५ वर्षासाठी ५ कोटी रुपये इतका देखभाल दुरूस्तीचा खर्च येणार आहे. यामध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रशांत शितोळे यांनी केला.
स्मार्ट सिटीच्या सर्वच निविदा संशयास्पद असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत केंद्रातील स्मार्ट सिटीचे प्रमुख कुणालकुमार व राज्याचे प्रमुख नितीन करीर यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराची पुराव्यासह तक्रार राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोकडे करण्यात येणार आहे. तसेच, स्मार्ट सिटी हा देश पातळीवरील सर्वात मोठा भ्रष्टाचार असून त्यात सल्लागार म्हणून केपीएमजी व अँड वाय या दोघांची नेमणूक आहे. याच सल्लागारांनी ठेकेदाराच्या बाजुने करारनामा केल्याचा आरोप नाना काटे यांनी केला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामात सुरू असलेल्या घोटाळ्याची माहिती व तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. स्मार्टसिटी हा देशपातळीवरचा घोटाळा आहे. भारतीय जनता पार्टी याच स्मार्ट सिटीच्या घोटाळ्यातून पैसे कमावून श्रीमंत झाली आहे. देशपातळीवर या स्मार्टसिटी योजनेत केवळ दोन सल्लागार नेमले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या घोटाळ्यांची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कडे करणार आहोत. यांना अद्दल घडवली पाहिजे, भाजपाच्या या भ्रष्टाचाराला प्रशासनाने साथ दिली आहे. सुमारे ५२० कोटींच्या कामात तब्बल अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा पराक्रम शहरातील भाजपा आमदारांसह तत्कालीन महापौर व स्थायी समिती सभापतींनी केला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला आहे.