पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूमुळे होणारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार दि.२२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड शहरवासियांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षेनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना कोवीड १९ या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची प्रसाराची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यू’ रविवार दि २२ मार्च रोजी पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत आपापल्या घरातच राहावे. या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकिय सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणाचे व प्रशासकीय यंत्रणाचे आभार मानण्यासाठी प्रत्येकाने सायंकाळी पाच वाजता पाच मीनिटांसाठी आपल्या घरातील गॅलरी अथवा खिडकीमध्ये उभे राहून टाळ्या वाजवून अथवा घंटानाद करावा असे आवाहन करण्यात आले असून त्याला सर्व पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहनही महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.