पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह देशावर कोरोनाचं मोठं संकट आलयं. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी आदेश जारी केलायं. तरी देखील नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनावश्यकपणे फिरताना दिसत आहेत. म्हणूनच पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहरात आजपासून खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. विनाकारण खासगी वाहन रस्त्यावर आल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. मात्र अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून ‘दंडुक्यांचा प्रसाद’ दिला जात आहे.
संचारबंदीच्या आदेशाला पिंपरी चिंचवडकरांनी गांभिर्याने घेतले नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनावश्यकपणे फिरताना दिसत आहेत. म्हणूनच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी शहरात खाजगी वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. आज मंगळवार दि.२४ रोजी सकाळपासून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. पिंपळे सौदागर येथील रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकांवर पोलिस कारवाई करत आहेत. वेळप्रसंगी अशा बेजबाबदार नागरिकांना ‘दंडुक्यांचा प्रसाद’ देखील दिला जात आहे.
कोरोनाचं आलेलं संकट हे अतिशय मोठं आहे. नागरिकांनी गांर्भिर्याने या परिस्थितीकडे पाहिले पाहिजे. पोलीस आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे. पोलीस आणि प्रशासन हे जनतेच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी निर्णय घेत आहेत. मात्र नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. तरच या महामारीला आपण हद्दपार करू. नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये, अन्यथा पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल असे आवाहन पोलीस करत आहेत.