पिंपरी (Pclive7.com):- कोरोना कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन केले. या लॉकडाऊन काळात पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज देऊन देशातील जनतेला दिलासा दिला. परंतू राज्यातील सरकार कोरोनाचा लढा लढण्यात अपयशी ठरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात पाच हजाराहून जास्त तर पिंपरीत 391 नागरिक आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण आहेत. या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरले आहे. पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पिंपरी चिचंवड शहराचे उद्योगक्षेत्रातील महत्व विचारात घेता या उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पालकमंत्री नेमावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपाचे माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी मंगळवारी (26 मे) केली आहे.
लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत एकदाही पालकमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरास भेट दिली नाही. या उद्योगनगरीकडून राज्याला व देशाला पुण्यापेक्षा जास्त महसूल मिळतो. तरीदेखील पालकमंत्र्यांचे पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष आहे. या महाविकास आघाडी सरकारने पिंपरी चिंचवड शहरासाठी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून किती निधी दिला हे देखील जाहीर करावे, अशीही मागणी प्रमोद निसळ यांनी केली आहे.
लॉकडाऊन 4.0 मध्ये पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने अनेक उद्योग व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे मागील आठ दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज (मंगळवारी) दुपारपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात 391 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर शहरात अद्यापपर्यंत 7 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील लॉकडाऊन शिथिल न करता अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रमोद निसळ यांनी पत्रकात म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group