पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण वर्ग सुरू केले आहेत. यात सर्वसामान्य गोरगरिब पालकांच्या विद्यार्थ्यांकडे आवश्यक ती टॅब, इंटरनेट सारखी साधने नसल्यामुळे त्यांना या शिक्षणापासून मुकावे लागत आहे. म्हणूनच राज्य सरकारने सर्व विद्यार्थ्यांना टॅब तसेच इंटरनेट सारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे अशी मागणी रयत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे. यासंदर्भात साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना ई-मेल द्वारे मागणी केली आहे.
साळवे यांनी दिलल्या निवेदनात म्हटलयं की, कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत. कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामार्फत ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेले साधने उपलब्ध नसल्याने शिक्षणाला मुकावे लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात अगोदरच अनेक पाल्यांच्या पालकांचे रोजगार बुडाले असून त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत असून पालकांचे कंबरडे मोडलेले आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना मोबाईल, टॅब, लॅपटॉप व ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साधने घेण्यासंदर्भात हट्ट करत आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयीच्या समस्या निर्माण होत असून मान, कंबर, मणका, डोळे, खांदा, मनगट दुखीच्या समस्या मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना होत असून पालक ह्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. आपण ऑनलाईन शिक्षणाला मुकणार म्हणून अनेक विद्यार्थी नैराश्यामधे जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल बीड जिल्ह्यातील गेवराई येथील अभिषेक संत ह्या हुशार व होतकरू विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न मिळाल्याने आत्महत्या केली आहे.
सदरील बाब ही गंभीर असून शिक्षणामध्ये श्रीमंत व गरीब अशी दरी निर्माण करणारी आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकत आहेत असे विद्यार्थी नैराश्यामधे जाऊन आजारी पडण्याच्या तक्रारी सुद्धा पाहायला भेटत आहेत. देशाचे भविष्य असणार्या ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व शैक्षणिक अधिकारापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घेणे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांने पुन्हा ऑनलाईन शिक्षणासाठी आत्महत्या केली तर त्या शिक्षण संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हे दाखल करावे. व सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होईल अशी यंत्रणा निर्माण करावी. तो पर्यंत ऑनलाईन शिक्षणा तात्काळ बंद करावे अथवा मोबाईल, टॅब, लॅपटॉप व ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साधने महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, नगरपालिका, शालेय संस्था यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे जेणे करुन पालकांवर व विद्यार्थ्यांवर कसल्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही व विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत अशी मागणी मागणी धम्मराज साळवे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group