पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जेम्बो रुग्णालय, ऑटोक्लस्टर, मोहननगर, बालनगरी, गवळीमाता, तसेच भोसरी येथील सर्व कोविड सेंटरच्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून हे सर्व कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने त्वरित सुरू करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
मारूती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील शासनाचे जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या हस्ते झाले असून ऑटोक्लस्टर येथील रुग्णालयाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यामध्ये आज हि खूप त्रुटी व दोष असून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खुप त्रास होत असून हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
त्यामुळे आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून या रुग्णालयांमध्ये कुठली त्रुटी अथवा दोष न ठेवता पारदर्शक पद्धतीने सर्व उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करावेत. म्हणजे रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयु मध्ये सर्व सोई-सुविधा युक्त जागा उपलब्ध ठेवणे. ऑक्सीजन पुरवठ्याच्या यंत्रणेत कुठलाही दोष नसला पाहिजे, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर असणाऱ्या सुसज्ज रुग्णवाहिका पाहिजे, तज्ञ डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी आरोग्य कर्मचारी उपलब्ध असले पाहिजेत, रुग्णांना सकस व दर्जेदार पाणी आणि भोजन पुरवठा झाला पाहिजे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात संपर्क राहील यासाठी सुरक्षित यंत्रणा उभी केली पाहिजे.
खाजगी रूग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट यांवर नियंत्रण रहायला हवे, या रुग्णालयात कुठल्याही गोळ्या औषधे अथवा इंजेक्शने पुरेशे राहतील याची काळजी घेतली पाहिजे. खाजगी रूग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट यांवर नियंत्रण रहायला हवे. RT-PCR टेस्ट, अँटेजन टेस्ट संख्या वाढवायला हव्यात. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्ण टाळाटाळ केली जाते अशा रूग्णालयाना गुन्हे दाखल करून नोटीस देण्यात याव्यात.
राज्यसरकार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पीएमआरडीए यांचा योग्य समन्वय राहिला पाहिजे. या सर्व अडचणी व समस्यांचे निवारण होण्यासाठी समन्वय समितीने सतर्क राहून यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. या संबंधित यंत्रणांना कार्यान्वित करून हे काम युद्धपातळीवर लवकरात लवकर करावे. जर या समस्यांचे निवारण लवकरात लवकर झाले नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा मारूती भापकर यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group