ठाणे (Pclive7.com):- ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील भिंवडीमध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली.
इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, परिसरातील सर्तक नागरिकांमुळे २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.






















Join Our Whatsapp Group