पुणे (Pclive7.com):- भोर, वेल्हा, गुंजवणी भागातील शेतकऱ्यांना ‘ओपन कॅनोल’द्वारे पाणी द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
छावा संघटनेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गुंजवणी धरणातून पुरंदर तसेच बारामती भागाला पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले काम सध्या गुंजवणी धरण परिसरात चालू झाले आहे.
परंतु गुंजवणी धरण परिसरातील तसेच वेल्हे तालुक्यातील अनेक गावे गुंजवणी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. ही योजना ही स्थानिक गावकर्यांवर अन्याय करणारी असून धरण उशाला व कोरड घश्याला अशी स्थिती निर्माण होत आहे. सरकारने याची योग्य दखल घेवून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा न करता कॅनोल माध्यमातून करून वेल्हे भोर तालुक्यातील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी छावा संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
“शेतकरी आज देशोधडीला लागत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणात गेल्या आहेत. त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा उद्योग हे शासन करत आहे.” असे मत छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी अमोल वीर यांनी सांगितले की, “शासन प्रशासनाने यामध्ये लक्ष देवून लवकरात लवकर काम थांबवावे अन्यथा छावा संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी छावा संघटना वेल्हे तालुका अध्यक्ष करण वाल्हेकर, विनोद वाल्हेकर, समीर वीर, अक्षय थिगळे, किरण राजपुत, संतोष खुळे, वैभव वाल्हेकर, दादा सुतार, दादाराव बोबडे यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.