चिंचवड (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त ‘दिव्यांग सेवा-संवाद’ उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसने महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाच्या सुरूवात करण्यात आली.या प्रसंगी महात्मा गांधींची प्रतिमा संस्थेस भेट देण्यात आली. पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्राला भेट स्वरूपात जीवनावश्यक वस्तू देऊन सेवा कार्य करण्यात आले.
या प्रसंगी “महात्मा गांधीः जीनवकार्य व विचार” या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते बी.आर.माडगूळकर यांनी व्याख्यान दिले.
ते म्हणाले, “महात्मा गांधी नी सत्य आणि अहिंसा ही दोन शस्रे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा प्रमुख सहभाग आहे. जगामध्ये अनेक देश शस्त्र बळाच्या सामर्थ्यावर स्वतंत्र झाले, पण महात्मा गांधींनी एक अभूतपूर्व इतिहास घडविला. हातात कोणतेही शस्त्र न घेता अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधी हे राजकीय पटलावरती सुर्यासारखे आत्मबलाच्या जोरावर तळपत होते. साधी राहणी उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता.सत्याग्रह करणा-या शेतक-यांशी चर्चेच्या माध्यामातून तोडगा काढण्याऐवजी सदरचे आंदोलन चिरडण्याचा केंद्र सरकारची कृती अतिशय निंदनीय आहे. हा प्रत्येक सत्याग्रहाची जाहीर अपमान आहे यांचे मी कडक शब्दात विंदाचे करत आहे. सरकारचे हे धाेरण भविष्यकाळात हुकूमशाही प्रत नेणारा आहे का? अशी राजकीय विश्लेषकांच्या मनामध्ये दाट शंका निर्माण करणारे आहे.”असे ते म्हणाले.
संस्थेला भेट दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये खाद्यतेल, विविध प्रकारच्या दाळी, पीठ, शेंगदाणे, साबुदाणा, साबण, फीनेल, कपडे पावडर, कडधान्ये आदि वस्तूंचा समावेश होता.
उपक्रमाबाबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी माहिती देताना सांगितले, “महात्मा गांधींच्या शिकवणी नुसार उपेक्षित, दुर्बल, गरीब, दुर्लक्षित, व समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या व्यक्तींच्या सेवेतच खरा आनंद व मानवतावाद सामावलेला आहे. आयुष्यभर आपल्या वर्तनातून गांधीजींनी मानवता, प्रेम, बंधुभाव, स्वच्छता, परोपकार, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सत्याग्रह त्याग, बलिदान या व अनेक मानवी जीवन मूल्यांचे महत्त्व पटवून दिले व आज त्यांच्या या शिकवणी नुसार गांधींना कार्य रुपी श्रद्धांजली वाहण्यासाठी या दिव्यांग सेवा-संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे”असे बनसोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी ममता अंध अनाथ कल्याण केंद्रांचे संचालक तुषार कांबळे, शहर काँग्रेस सोशल मिडीयाचे अध्यक्ष आयुष मंगल, नेहा मंगल, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा शंकर ढोरे, सरचिटणीस मिलिंद बनसोडे, रोहन वाघमारे, प्रविण जाधव, राकेश संपागे, मयुर तिखे आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group