पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट लवकर दूर होवो, असे साकडे तुकोबांकडे देहूसंस्थानने घातले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न झाला. अत्यंत धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/03/IMG-20210330-WA0025-1024x768.jpg)
हरिनामाचा गजर, तुकोबांचे नामस्मरण आणि टाळ मृदंगाच्या गजरात देहूनगरी दुमदुमून निघाली. कोरोना संकटामुळे देहूत मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला. दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. परंतु, कोरोना संकटामुळे महराष्ट्रात बहुतांश भागात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर, काही ठिकाणी निर्बंध आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यामुळे देहूतही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे देहूच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यावेळी देहू संस्थांकडून सांगण्यात आलं की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल होतात. यावर्षी कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे कौरोना नियमांचं पालन करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा करण्याचं ठरवलं होतं. महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्व सुरळीत होवो, असं देहू संस्थानच्या वतीने साकडं घालण्यात आलं.