मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. सुरुवातीला राज्य सरकारनं १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर १ जून २०२१ पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. १ जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता प्रश्न उपस्थित होतोय तो १ जूननंतर लॉकडाऊन असेल की नसेल. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लॉकडाऊन संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे १ जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल या संदर्भात राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.