पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे महापालिकेत व पीएमआरडीएमध्ये विलिनीकरणामुळे शहराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट शहरवासीयांचा फायदाच झाला असून अनेक प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहेत. मात्र, या निर्णयामुळे दुकानदारी बंद होऊन भाजपच्या आमदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार विरोधात आकांडतांडव करत विलिनीकरणाबात शहराची दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गुरुवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.
प्राधिकरण विलिनीकरणाच्या शासन निर्णयात सर्व बाबी शासनाने स्पष्ट केल्या आहेत. परंतु, ते समजून न घेता चुकीचे आरोप भाजपने केले आहेत. शहर आणि नागरिकांचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्न निकाली निघतील. ही घरे नागरिकांच्या मालकीची होणार असून बांधकामे नियमित होण्यास मदत होईल. यासह पीएमआरडीएच्या कमिटीत महापालिका महापौर, स्थायी अध्यक्ष व आयुक्तही असणार आहे. यात शहराचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
भाजपच्या काही मंडळींवर याचा परिणाम होणार असल्याने नैराश्यातून शहराची दिशाभूल करत आहेत. त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाकडे प्राधिकरण असताना ज्यांनी हित साधले. संधी साधून भागिदारी केली. ही संधी गेल्याने ते हैराण आहेत. दुकानदारी बंद झाल्याने नैराश्यातून आरोप करत आहेत.
प्राधिकरणाला मिळणा-या ठेवी व जमिनींचा पैसा पीएमआरडीला देण्याचा आरोप बिनबुडाचा आहे. उलट आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी शासनाचा निधी शहरात येणार आहे. त्याचा फायदा शहरालाच होणार आहे. आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना ते आरोप करण्याचा अधिकारच नसल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केला.