पिंपरी (Pclive7.com):- श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गरु संत तुकाराम महाराज अर्थात भक्ती-शक्ती उड्डाण पुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही प्रशासन, सत्ताधारी भाजपकडून उद्घाटन केले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) पुलाचे उद्घाटन केले. उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना नगरसेवक अमित गावडे, तानाजी खाडे, फजल शेख, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, विजय लोखंडे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर निगडी येथे पुणे-मुंबई महामार्ग आणि यमुनानगर ते निगडी प्राधिकरण रस्ता जिथे मिळतो. त्या चौकातील हा दुमजली उड्डाणपूल आहे. दुसऱ्या मजल्यावरचा पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलाचा मुख्य मार्ग सुरू सहा महिन्यापूर्वी सुरू केला, पण पहिल्या मजल्यावरचा रिंग रोड हा शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्ण झाल्याचे पत्र स्थापत्य विभागाने केव्हाच दिले आहे.
तीन वर्षे या उड्डाण पुलाच्या कामामुळे दीड-दोन किलोमीटरचा वळसा मारायचा त्रास जनतेने गपगुमान सहन केला. आता मार्ग पूर्ण होऊनही केवेळ उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यासाठी अत्यंत महत्वाचा लोकांच्या सोयिचा मार्ग बंद असल्याने लोक संतापले असल्याचे नगरसेवक अमित गावडे म्हणाले. नागरिकांच्या सोईसाठी आम्ही पुलाचे उद्घाटन केले.
महापालिका प्रशासनाने काम पूर्ण झाल्याचे पत्र महापौरांना दिले आहे. विरोधाकांसह नागरिकांनी मागणी करूनही पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी केली होती. तर, भाजप त्यांच्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची भूमिका घेतली आहे. पुलाचे उद्घाटन केले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज पूल वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.





















Join Our Whatsapp Group