पुणे (Pclive7.com):- रिंगरोडसाठी कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, तसेच बाधित शेतकऱ्यांची मुस्कटदाबी थांबवा आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार निर्मिती करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी (बुधवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, त्यांच्या समस्या समस्या मांडल्या.
यावेळी पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, भारत जगताप, आशिष कांटे, महेश जायकर, विराज कोंडे, सचिन पायगुडे, बाळासाहेब बराटे, बाबा गायकवाड, योगेश मांगले, नाना कोंडे, सुहास परळीकर, हनुमंत कांबळे, अंकुश भगत, सागर दिसले, मारूती भगत, कांतीलाल पायगुडे, तुकाराम तनपुरे, विठ्ठल ठाकर, अमोल ठाकर, यांच्यासह मांडवी बुद्रुक, बहुली, वरदाडे, शिवगंगा खोरे, रहाटवडे, कल्याण (हवेली), रांजे, कुसेगांव, खोपी, कांजळे, केळवडे, भोर आदी गावचे सरपंच तथा शेतकरी उपस्थित होते.
या बैठकी वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी रिंगरोडची प्रस्तावित आखणी बागायत क्षेत्रातून रद्द करुन डोंगर पायथ्याने माळरानातून व्हावी. तसेच रस्त्यांची रुंदी ११० मीटर ऐवजी 90 मीटर व्हावी, त्याचबरोबर प्रस्तावित रस्ता खुला करुन त्यास सर्व्हिस रोड असावा, तसेच बाधित शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुन सुरु असलेले जमीन अधिग्रहण थांबवून त्यांना योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर पाटील म्हणाले की, रिंगरोडसाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कृती आराखडा मंजूर केला होता. मात्र, तो रद्द करुन आघाडी सरकार बळजबरीने शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुन रिंगरोडची निर्मिती होणार असेल, तर भारतीय जनता पक्ष त्याला कडाडून विरोध करेल.
ते पुढे म्हणाले की, रिंगरोडमुळे बाधित शेतकऱ्यांसोबत लवकरच जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांना जाब विचारणार आहे. जर यामधूनही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या बैठकी नंतर बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रिंग रोड प्रश्नी बाधितांना भारतीय जनता पक्षाकडून नक्की न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.