पिंपरी (Pclive7.com):- प्रशासकीय सेवा असो की, इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर, कष्टाशिवाय पर्याय नाही, असे सांगतानाच सोशल मीडियापासून दूर राहावे, योग्य कारणांसाठीच त्याचा वापर करावा, असे आवाहन माधुरी भानुदास गरुड यांनी केले आहे. तर, धाडसी कामगिरी बजावलेल्या भोसरीतील आयुष गणेश तापकीर याने मोठेपणी पोलीस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएसी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगवी येथील माधुरी भानुदास गरुड, तसेच धाडसी कामगिरी करून दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या १३ वर्षीय आयुष गणेश तापकीर या दोघांचा, दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिशाचे अध्यक्ष नाना शिवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, गोरख भालेकर, सचिन साठे, दिशाचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिव संतोष निंबाळकर, खजिनदार नंदकुमार कांबळे, सदस्य राजेश सावंत, किशोर जवळकर, अतुल शिंदे, ॲड. अविनाश ववले आदी उपस्थित होते.
सांगवीत सत्कारप्रसंगी बोलताना माधुरी गरुड म्हणाल्या की, मला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याचा छंद होता. त्याचा खूप उपयोग झाला. नोट्स, पुस्तके, क्लासेस हे केवळ सारथीमुळेच शक्य झाले. संदर्भीय पुस्तकातून मी स्वतः नोट्स तयार केल्या. पंधरा ते अठरा तास रोज नियमित अभ्यास केला. खरंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले छंद सोडण्याची आवश्यकता नसते.
मी तर भरतनाट्यम, झुम्बा डान्स, फिरणे आणि वाचन हे छंद जोपासले. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश हवे असेल तर भावनिक, शारीरिक आणि सोशल कॅपिटलची बांधणी करावीच लागते. त्यातील एकही बाजू कमकुवत असून चालत नाही. मी ते जपले, म्हणूनच मला यश मिळाले. या यशात माझ्या आईवडिलांनी दिलेले प्रोत्साहन मला खूपच प्रेरक ठरले.
भोसरीतील आयुष तापकीर म्हणाला की, आज मला खूप आनंद होतो आहे की, मी दोन मुलांचा जीव वाचू शकलो. झालेला घटनाक्रम सविस्तरपणे सांगताना त्याने नमूद केले की, पाण्यात उडी मारताना तसेच मुलांना पाण्यातून बाहेर काढताना मला अजिबात भीती वाटली नाही, मात्र हा प्रकार घरी कळल्यानंतर घरच्यांकडून काय प्रतिक्रिया उमटेल, याबाबत माझ्या मनात प्रचंड भीती होती.
मला मोठेपणी पोलीस अधिकारी व्हायला आवडेल, असा मानस त्याने यावेळी व्यक्त केला. त्याच्या या धाडसी कामगिरीबद्दल त्याला राष्ट्रपती शौर्य पदक मिळेल अशी अपेक्षा तापकीर कुटुंबासह संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांना वाटते.कार्यक्रमाचे नियोजन संतोष निंबाळकर, संतोष बाबर, नंदकुमार कांबळे, राजेश सावंत, किशोर जवळकर, अतुल शिंदे, ॲड. अविनाश ववले यांनी केले.