पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस इखलास सय्यद यांच्या समवेत आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणच्या अधिका-यांसोबत बैठक घ्यावी आणि वीज पुरवठा सुरळित करावा अशी मागणी आमदार बनसोडेंकडे केली.
आण्णा कुर्हाडे, रमेश भोरकर, वसंत सोनार, आशा शिंदे, सुभाष चौधरी, सुनील पाटील, महेश भोसले, राज पडवळ, मारूती काळे, सुनील खळदकर, नम्रता गुरव, विमल गायकवाड, रेखा पाटील, सुजाता कुंभार, रत्ना पाटील, शोभा साळवी, सनी गोडसे उपस्थित होते.
इखलास सय्यद म्हणाले, गेल्या एक वर्षापासून आकुर्डी परिसरात वीज पुरवठा सतत खंडित होत असून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. काही भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा असल्याने ज्यादिवशी पाणी पुरवठा असतो. नेमका त्याचदिवशी वीज जाते. त्यामुळे दोन, तीन मजली इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना पाणी वरच्या टाकीवर चढवता येत नाही.
परिणामी, खूप हाल होतात. त्यामुळे आपल्या कार्यालयात महावितरणचे सर्व अधिकारी आणि आकुर्डीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नागरिकांची संयुक्त मिटींग घ्यावी. वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आमदार बनसोडे यांच्याकडे केली आहे.