पिंपरी (Pclive7.com):- उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजपप्रमाणेच व्यापारी संघटनांनीही बंदला विरोध दर्शविला होता. मात्र, शिवसेना बंदमध्ये सहभागी असल्याने मुंबई, ठाण्यातील व्यापाऱ्यांची कसोटी लागणार असल्याचे चित्र दिसत होते. बंदला विरोध करणार असल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट करणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी रविवारी रात्री मात्र बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली.
बंदसाठी राष्ट्रवादीनेही ताकद लावल्याने पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सारे व्यवहार ठप्प होऊ शकतात. गावागावांमधील एकही दुकान उघडे राहाता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील. दरम्यान, बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपनेही विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या विविध संघटना किंवा कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून बंदची हाक
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात महा विकास आघाडीच्या वतीने आज (दि.११) सकाळी ९ वाजता पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात येणार आहे आज सर्व शहरवासीयांनी या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले.
मागील सात वर्षांपासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे. देशभरातील जनतेला फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशातील लोकशाहीचा गळा घोटणारे हुकूमशाही निर्णय घेतले. अशा हुकूमशाही सरकारच्या धोरणामुळे देशातील सर्व थरातील सर्व समाज घटक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पिंपरीतील आंदोलनात उपस्थित राहून केंद्र सरकार विरुध्द तीव्र निषेध नोंदवावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.