आळंदी (Pclive7.com):- आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२२ या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले जाते, त्या रथाला बैलजोडीचा मान आळंदी येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा प्रातिनिधीक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत एस.टी.महामंडळाच्या बसने पार पडला गेला. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पालखी सोहळा पायी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २१ जुन रोजी होणार आहे. त्याच अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैलजोडी समिती सदस्यांच्या झालेल्या सभेत रोटेशन नुसार एकमताने आळंदीतील पांडुरंग वरखडे यांच्या कुटुंबाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बैलजोडीचा मान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
यावेळी विश्वस्त अभय टिळक, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सदस्य शिवाजीराव रानवडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, माऊली वहीले, रमेश कुऱ्हाडे, पांडुरंग वरखडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त ६ कुटुंबालाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालू आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना १८ दिवसाचा प्रवास असतो. यामध्ये फक्त २ खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीच २ बैलजोडी पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो.
बैलजोडी समितीने एकमताने पांडुरंग वरखडे यांची निवड केल्यानंतर त्यांचा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त अभय टिळक आणि आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे आणि सदस्य यांनी यावेळी सत्कार केला. यावेळी विविध स्तरातून वरखडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.