तहसीलदार तथा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना मातंग समाजाच्या वतीने निवेदन
पिंपरी (Pclive7.com):- औरंगाबाद येथे मागासवर्गीय तरुण मनोज आव्हाड यांची भर दिवसा क्रूरपणे हत्या करण्यात आली. अत्यंत शुल्लक कारणावरून तेथील काही नराधमांनी ही हत्या केली व हत्तेचा व्हिडिओ दहशत पसरवण्याचा हेतूने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला. यासंबंधी हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मनोज आव्हाड यांच्या कुटुंबाला सरकारने 50 लाख रुपयांची मदत करावी असे निवेदन तहसीलदार तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे म्हणाले, अत्यंत वाईट पद्धतीने मनोज आव्हाड या तरुणाची क्रूर हत्या करण्यात आली. लाईट चोरीचा आरोप त्याच्यावर ठेवून काठी आणि फावड्याने भर चौकात हात बांधून एकाच कुटुंबातील तरुणांनी त्याची हत्या केली व तो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरविला. महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत दहशत तसेच पोलिसांचा वचक नसलेले वातावरण असून आम्ही महाराष्ट्रात राहतो की तालिबान मध्ये? याची आम्हाला शंका वाटत आहे. हा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून याच्या प्रमुख सूत्रधारा पर्यंत पोचून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मृत तरुणाच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत तातडीने सरकारने जाहीर करावी पूर्ण महाराष्ट्रातून आज मागणी होत आहे. यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असे ते म्हणाले.
निवेदन देण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष संजय ससाने, भाजपचे पदाधिकारी मनोज तोरडमल, सुभाष सरवदे, नेताजी शिंदे, किशोर हातागळे, जयदास साळवे तसेच समाजाचे मातंग समाज समितीचे सागर गायकवाड, किशोर नवघिरे, दीपक चखाले, विकास जगधने, बबन आडागळे, सचिन आडागळे, संतोष ऊल्हारे, जयवंत गायकवाड, अरुण जोगदंड, अमोल कूचेकर, अविनाश कांबीकर, समीर मोरे, भाऊसाहेब अडगळे, कोमल शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे राजू आवळे उपस्थित होते.