आळंदीत आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषद हद्दीतील सर्व अतिक्रमणे कसलाही भेदभाव न करता सरसकट काढण्याचे आदेश खेड प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आळंदी नगरपरिषदेला दिला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाच्या निमित्ताने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज भक्तनिवासात प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या आढावा बैठकीला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, आळंदी पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर साबळे, प्रकाश जाधव, रविंद्र जाधव, मच्छिंद्र शेंडे, दिंडी संघटनचे मारुती कोकोटे, संतोष तुळशीराम भोसले, सुदीप गरुड, माऊली घुंडरे आदी आळंदीकर ग्रामस्थ व पालखी सोहळ्याशी निगडित विविध प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रांत विक्रांत चव्हाण यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी शहरात येणाऱ्या दिंडीच्या अत्यावश्यक सेवा असणाऱ्या गाड्यांची अडवनुक पोलिस प्रशासनाकडून केली जाणार नाही. तसेच पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील एक दिवसाआड पाणी योजनेवर लवकरच तोडगा काढावा प्रस्थान काळात २४ तास पाणीपुरवठा केला जावा अशी सूचना यावेळी देण्यात आली आहे.
वारकर्यांना इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी सुद्धा सोडण्यात येईल. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंड्यांना गॅस पुरवठा १५ जून पासून करण्यात येईल. यात्रा कालावधीमध्ये विद्युत विभाग, आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभाग यांनी जबाबदारीने काम करावे असे यावेळी सांगण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दिनांक २१ जून रोजी होणार असून, गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे मर्यादित लोकांमध्ये हा सोहळा संपन्न होत होता. परंतु यंदा मात्र पायी पालखी सोहळा होणार असून प्रस्थान सोहळ्यासाठी येणारा भाविक हा जेमतेम दोन ते तीन लाखाच्या आसपास असू शकतो. त्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना संस्थान कमिटी आणि संबंधित घटका मार्फत केली जाणार आहे असे पालखी सोहळाप्रमुख विकास ढगे पाटील यांनी यावेळी सांगितले.