पिंपरी (Pclive7.com):- पूर्वी आपले पूर्वज निसर्गानुरुप राहून जगत होते. आहार सकस संतुलित घेत असल्याने शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते. आहार हेच औषधाचे कार्य करीत असल्याने कुणीच आजारी पडत नव्हते. आता मात्र प्रत्येक घरात एकतरी आजारी असल्याने जगण्यासाठी गोळ्या औषधांचा आधार घ्यावा लागतो. पूर्वी आहार हेच औषध होते तर सध्या औषधे हाच आहार बनला आहे. जुनी जीवनशैलीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. असे न केल्यास मानवजातीचे अध:पतन अटळ आहे. असे मत राहुरी येथील आहारतज्ञ अविनाश साबरे यांनी व्यक्त केले.
निगडी येथील जयहिंद मित्र मंडळ ट्रस्ट आणि जय बजरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेत “आहार हेच औषध”या विषयावर ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक अमित गावडे, गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश फलके, कार्याध्यक्ष दयाराम क्षीरसागर आदी उपस्थित होते.
साबरे पुढे म्हणाले कि, देशात हरितक्रांती झाल्याने शेतमाल वाढला त्याबरोबर आजार ही वाढले. ज्या देशात भरपूर दुध (विदेशी गायीचे) आहे त्या देशातील नागरिक दूध पित नाही. मात्र आमच्याकडे दूध आणि दूध पावडर मोठ्या प्रमाणात विकले जाते. मधुमेह होण्यामागे अनेक कारणांपैकी दूध हे एक कारण आहे. म्हणूनच आहारामध्ये आपण दूध, दुग्धजन्य पदार्थ, चहा, कॉफी व मांसाहार, औद्योगिक उत्पादने व न्यूट्रिशन सप्लिमेंट वर्ज्य केले पाहिजेत.
अन्नपदार्थात सर्व प्रकारची फळे व सलाड टोमॅटो, काकडी, गाजर बीट इ.तसेच ड्रायफ्रूट, मोड आलेली कड धान्ये इत्यादी हे डीआयपी डायटमध्ये येते. तर शिजवलेले शाकाहारी अन्न (वरण भात, भाजी पोळी इ.) हे व्हीआयपी डायटमध्ये समावेश असतो. निसर्गाच्या विरोधात गेल्याने हे दुष्परिणाम दिसायला लागले आहे.माणूस नावाच्या प्राण्यांव्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी अन्न शिजवून खात नाही. चुकीच्या आहारपद्धतीमुळे आज भारत हा मधुमेह, हृदयरोग व कर्करोगाचे माहेरघर बनले आहे.
आम्ही आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये निसर्गोपचार पद्धतीने गंभीर रुग्ण वाचवले हि ताकद आहे. यासाठी डॉ.बिस्वरुप रॉय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. शिवकालीन मावळे तर जास्तीतजास्त निसर्गातील फळेव पालेभाज्या इ. खात असल्यामुळे ते रांगडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बेताळे तर आभार दयाराम क्षीरसागर यांनी मानले.